व्यक्तिविशेष
मागील काही वर्षात खूप चांगली माणसे भेटलीत . मग ते विदेशात राहून स्वदेशातील लोकांविषयी आपुलकी ठेवणारे स्वप्नील दादा ,अजय दादा असोत, पोलीस असतानाही सामान्याविषयी माणुसकी जपणारे विद्यानंद जी असोत किंवा स्वतःजवळ थोडे असूनही इतरांना काही देण्याची वृत्ती असणारे नरेन्द्र जी असोत. (यादी मोठी आहे ) . या सर्वांकडून मला खूप काही शिकता आले. इतरांसाठी काही करण्याची इच्छा असल्यास कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग निघतात हे आता मला पक्के समजले आहे.
आज मी एका व्यक्तीबद्दल लिहिणार आहे . कारण आज मला लिहावसे वाटले . माणूस त्याच्याबद्दल च लिहितो ज्याच्याविषयी प्रेम ,आदर वाटतो .
केकी - नाव जरा वेगळे आहे आणि माणूस ही वेगळा आहे. केकी आणि माझी ओळख तीन वर्षांपूर्वी ची . चांदर शाळेत असताना त्यांनी माझी बातमी वर्तमानपत्रात वाचली होती आणि मग कुठूनतरी माझा मोबाईल नंबर मिळवून त्यांनी मला संपर्क केला . तेव्हापासून आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत.
मी सध्या कार्यरत असलेल्या गो-हे बु. शाळेतील विविध उपक्रमांना ते नेहमीच भरभरून दाद देतात . नुकतेच आम्ही शाळेत सुरु केलेल्या तुरीय लॅब च्या नूतनीकरणासाठी हि त्यांनी पुढाकार घेतला .
मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात ते मला भेटायला पुण्यात आले होते . खरे म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्याकडे येतोय या विचाराने मी जरा घाबरलो होतो . पण ते आले तेव्हा एकदा पण असे वाटले नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय . ते शाळेत आले . शाळेतील सर्व उपक्रम जाणून घेतले .मागील दोन वर्षात शाळेत जे बदल झाले ते पाहून त्यांना फार छान वाटले शाळेच्या आणखी काय गरजा आहेत याची माहितीही त्यांनी घेतली. आणि तात्काळ मदत ही जाहीर केली .
पण आज त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण वेगळे आहे.
पश्चिम बंगल मध्ये नुकतेच Amphan वादळ येऊन गेले. आपल्याला माहितच आहे, सध्या बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वादळाचा तडाखा बसला आहे.
अनेक लोकांना आपली घरं गमवावी लागली आहेत. यापैकीच एक आमता या गावात राहणारे, रितूपर्णा बिस्वास आणि शुभेंदू भंडारी. हे दोघेही नाटक करतात.
photo cre. Amta Parichay
"आमता परिचय" नावाची त्यांची नाट्यसंस्था आहे. 'इलादिदि' ही त्यांचं गाजलेलं नाटक.
हे दोघंही एका छोट्या गावात राहून नाटक करतात. गावागावातल्या लोकांपर्यंत त्यांनी नाटक पोहोचवलं आहे.
सध्या लॉकडाऊन नंतर ते अगदी बिकट परिस्थितीत होते. नाटक करणाऱ्या लोकांसाठी प्रयोग हे एकमेव पैसे मिळवण्याचं माध्यम ते आत्ता पूर्ण ठप्प झालं आहे.
त्यातच आता वादळाच्या तडाख्यामुळे ते अजूनच खचले आहेत.
त्यांची नाटकाची जागा हेच त्यांचं घर. बांबूने बांधलेली ही जागा अत्यंत वाईट अवस्थेत आहे, त्याबाजूची सिमेंटची त्यांची राहण्याची खोली पडली आहे. नाटकाचं काही सामान वाहून गेलं आहे तर काही खराब झालं आहे. घरात सामान नाही. जेवायचीसुध्दा मारामार आहे.
सरकार 'नाटक करणाऱ्यांकडं' लक्ष देईल अशी परिस्थिती सध्यातरी नाही.
या सगळ्या परिस्थितीत त्यांना मानसिक आधाराबरोबर आर्थिक मदतीचीही गरज होती .
आज सकाळी च मी केकी शी याबाबात बोललो. तात्काळ ते रितुपर्णा दीदी शी बॊलले आणि त्यांना शक्य तितकी मदत पाठविली . ही मदत खुप मोठी आहे।
वरील तीन ओळी वाचायला फार वेळ लागला नसेल पण ते लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी तरवळले. कारण अशा गरजेच्या वेळी रितुपर्णा दीदी ला मिळालेली मदत आणि तिच्याशी बोलताना तिने व्यक्त केलेल्या भावना फार गोष्टी सांगून गेल्या .
केकी जी सारखे माणसे पृथ्वीवर भरभरून जन्म घ्यावीत हीच इच्छा व्यक्त करतो.
टिप - माझे लिखाण चांगले नाही . सर्वच भावना इथे व्यक्त करता आल्या नाहीत.
आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की दया
आमता परिचय बददल आणखी फोटो
No comments:
Post a Comment